मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील पक्ष-संघटनांना गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम न करण्याचे आवाहन


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्ष आणि संघटनांना कळकळीची विनंती केली आहे. मागील कोरोनाच्या लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित थांबवावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता. पण आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू. तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नसल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. हे उघडा ते उघडा या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे.

प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच मी माझ्या शिवसेना पक्षासह सर्वच राजकीय पक्षांना विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत, तर उद्या नक्की येतील, पण घरातील प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल, तर शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल, हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

आपणांस हे आवाहन मला वारंवार एवढ्यासाठीच करावे लागत आहे, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढत आहे. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल, तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे. दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली, त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केली आहे. अमेरिकेत तिसऱ्या लाटेने जनजीवन अत्यावस्त केले. चीनही त्याच्या विळख्यात सापडला आहे. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३० हजार नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.