बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवानंतर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा


मुंबई – बेळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. पण, त्याच वेळी या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोठा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून महाराष्ट्रात विजयाचा आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र टीका करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजपवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. मराठी माणूस बेळगावमध्ये हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटत आहात, लाज नाही वाटत तुम्हाला? असा सवालच संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी बेळगावमधील निकालांमागे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. बेळगावमध्ये मराठी माणूस सत्ता स्थापन करेल अशी खात्री आम्हाला होती. याआधी मराठी एकजुटीचाच बेळगावमध्ये विजय झाला आहे. पण आज २ किंवा ३ जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्दैवी जरी असले, तरी यामागे किती कारस्थान झाले असेल, याची कल्पना करवत नाही. कर्नाटक सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून महाराष्ट्राचा हक्क बेळगाववर राहू नये, यासाठी काय गडबड केली आहे, त्यासंदर्भात माहिती हळूहळू समोर येईल, असे ते म्हणाले.

भाजपचा बेळगावमध्ये विजय झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपकडून त्यावर आनंद व्यक्त करण्यात येत असताना त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. बेळगावात मराठी माणसाच्या झालेल्या पराभवाबद्दल महाराष्ट्रात आज ज्यांना उकळ्या फुटत आहेत, जे आज पेढे वाटत आहेत, त्यांना एवढेच सांगतो की महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासात एवढी नादानी, एवढा नालायकपणा आणि मराठी माणसाच्या बाबतीत एवढी गद्दारी आत्तापर्यंत कुणी केली नव्हती. महाराष्ट्रात अनेकांना याचे दु:ख आहे की तिथे मराठी माणूस हरवला गेला. पण तुम्ही पेढे कसले वाटत आहात? असे राऊत म्हणाले.

बेळगावात तुमचा पक्ष जिंकला असेल, पण तिथे मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला आहे. जे पेढे वाटत आहेत, त्यांना मराठी जनता माफ करणार नाही. शेकडो लोकांनी बलिदान दिले. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ६९ मराठी सैनिकांनी हौतात्म्य दिले आहे. त्यासाठी बाळासाहेब तुरुंगात देखील गेले आहेत. पण तुम्ही पेढे वाटत आहात मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत तुम्हाला? राजकारण बाजूला ठेवा, पण एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला पेढे वाटताना, जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे, असे देखील राऊत म्हणाले.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे देखील बेळगावातील मराठी संघटनांच्या पाठिशी कसे राहिले, त्याचे देखील उदाहरण संजय राऊत यांनी यावेळी बोलताना दिले. तुमचा भगवा जर तिथे खरंच असेल, तर कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा उतरवला, तेव्हा तुमच्या तोंडात बोळके का कोंबले होते? तेथील मराठी माणसांवर अन्याय होतो, तेव्हा तुम्ही गप्प का बसता? महाराष्ट्र एकीकरण समिती तेथील मराठी माणसाची प्रातिनिधिक समिती आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे देखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच पाठिशी उभे राहिले होते, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.