रत्नागिरीत गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नवी नियमावली जाहीर


रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. कारण आता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता ती आता गावातच केली जाणार आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून गावामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची आणि भाविकांची माहिती रेल्वे प्रशासन, एसटी विभाग आणि गुगल फॉर्मच्या मदतीने गोळा केली जाणार आहे.

आशा वर्करच्या मार्फत गावात आलेल्या प्रत्येक चाकरमान्यांची प्राथमिक तपासणी केली जाईल. त्यानंतर तपासणीअंती कोणातही कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. ग्रामकृती दल, सरपंच, पोलिस पाटील यांना याबाबतच्या सर्व सूचना देण्यात आल्या असून सहकार्य न करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसी कारवाई केली जाईल. याबाबतची नवीन नियमावली रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने काल रात्री जाहीर केली असून नव्या नियमावलीबाबत मात्र सर्वसामान्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकण असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असतात. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी दोन डोस पूर्ण होणे किंवा 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला होता. पण आता थेट गावात आल्यानंतरच चाकरमान्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

दरम्यान पूर्णपणे योग्यरितीने याबाबतचे नियोजन झाले असून त्याबाबत ग्राम कृतीदल, आशा वर्कर, पोलीस पाटील, सरपंच यांच्यात चर्चा झाली असून त्यांच्याकडून देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय नागरिकांची देखील जबाबदारीच असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली आहे.