मंदा म्हात्रे यांनी केला भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप


मुंबई – आपल्या पक्षालाच भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी घरचा आहेर दिला आहे. मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. मंदा म्हात्रे यांनी ही खंत महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यापुढेच बोलून दाखवली आहे. यावेळी मंदा म्हात्रे यांनी दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. आपण २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते, असे देखील यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्या. त्याचप्रमाणे, स्वतःच्या कामावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याचा दावा देखील मंदा म्हात्रे यांनी केला आहे.

विधानसभेवर दोनदा निवडून आल्यानंतर, कर्तृत्व सिद्ध करून दाखवून सुद्धा पक्षाकडून डावलले जात असल्याचे म्हणत मंदा म्हात्रे यांनी यशोमती ठाकूर यांच्यासमोर आपली पक्षावरील नाराजी व्यक्त केली आहे. मंदा म्हात्रे यावेळी म्हणाल्या, महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले, तेव्हा मोदींची लाट होती असे म्हटले गेले. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझे काम होते, माझे कर्तृत्व होते. पण महिलांनी केलेले काम झाकून टाकायचे, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत, असे प्रकार होतात.

यावेळी बोलताना मंदा म्हात्रे पुढे म्हणाल्या कि, कोणालाही मी घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष असतात ना आपल्याला साथ द्यायला. महिलांना राजकारणात यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, अशी खंतसुद्धा मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. पण, आपण कधीही स्वतःला कमी समजू नये, असा सल्ला देखील यावेळी मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.