राजू शेट्टींचा पत्ता कट केल्याच्या वृत्तावर जयंत पाटील म्हणतात…


चाळीसगाव – विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकाटिप्पणी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण कुणाचेही नाव विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीतून वगळले नसल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. नुकताच चाळीसगावसहीत पूरग्रस्त भागांचा जयंत पाटील यांनी पाहणी दौरा केला. त्यांनी यावेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेत अनेक विषयांवर भाष्य केले.

जयंत पाटील म्हणाले, कुणाचेही नाव विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीतून वगळण्यात आलेले नाही. राज्य सरकारच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा राज्यपालांना विनंती केलेली आहे. तीनही पक्षांच्या सहमतीनेच राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर राज्यपालांनी लवकर निर्णय घावा अशी अपेक्षा आहे. कारण लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला आता वाटायला लागले आहे. बराच काळ झाला, त्याच्यावरचा निर्णय येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ईडीने एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या कारवाईवर बोलतांना पाटील म्हणाले, या देशात ईडी विरोधी पक्षावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत असते. कुणाची कोणतीही चूक नसताना विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणाचा वापर केला जात असल्यामुळे चूक नसतांना कारवाई करणे आणि बदनामी करणे किंवा प्रभावित करणे सूरु आहे.

जयंत पाटील ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलतांना म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न स्थानिक स्वराज्य निवडणुकांपुर्वी मार्गी लागावा. अशी आमच्या तीनही पक्षाची भूमिका आहे. त्यासाठी सर्व पक्षीय बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली असल्यामुळे नवीन काही बोलण्याचा प्रश्न नाही.