कोणीही जर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू ; राकेश टिकैत


नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कृषि विधेयकांना विरोध करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये रविवारी महापंचायतीचे आयोजन केले आहे. मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असा विश्वास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. महापंचायतीसाठी किती लोक येतील, हे सांगणे शक्य नाही. पण, लोक मोठ्या संख्येने येथे पोहोचतील एवढे मात्र नक्की. महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून शेतकऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही. जर आम्हाला थांबवण्याचा कोणीही प्रयत्न केला, तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

सुमारे दोन हजार शेतकरी पंजाबमधून मुझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे. ते अमृतसरहून पहाटे ४ वाजता, जालंधरमधून सकाळी ५ वाजता आणि लुधियानाहून सकाळी ६ वाजता ट्रेन पकडतील. दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळावरून ४००ते५०० शेतकरी महापंचायतीकडे रवाना होतील. टिकरी आणि गाजीपूर सीमेवरून शेतकरी बसने मुझफ्फरपूरसाठी निघत आहेत.

मुझफ्फरनगरसाठी शुक्रवारी रात्री दोन बस रवाना झाल्या, आज शनिवारी सकाळी आणखी दोन बस गेल्या असून इतर बस रात्री शेतकऱ्यांना घेऊन निघतील. महापंचायतीसाठी गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक येत असल्याचेही राकेश टिकैत यांनी सांगितले. तसेच हरियाणा, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील शेतकरीही महापंचायतीत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता टिकैत यांनी वर्तवली. शेतकऱ्यांना मुजफ्फरनगरला नेण्यासाठी ५०० बसेस भाड्याने घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

केवळ निवडणुकीशी ही महापंचायत जोडलेली नाही. सहा महिन्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत. तेथील शेतकरी अडचणीत आहेत. यूपीमध्ये विजेचे दरही सर्वाधिक आहेत. २०१६ पासून उसाच्या दरात वाढ झालेली नाही. केवळ पाच रुपये, पाच पैसे प्रति किलोने दरात वाढ करून तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करत आहात का? असा सवालही राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला केला आहे.

५ हजार स्वयंसेवकांना महापंचायत सुरळीतरित्या पार पडावी, याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. शिवाय काही अडचण आल्यास सर्व स्वयंसेवकांना आपत्कालीन क्रमांक देण्यात आला आहे. महापंचायतीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंचायतीच्या मुख्य व्यासपीठापर्यंत कोण-कोण पोहोचू शकते, हे पहावे लागेल. तसेच गर्दीमुळे जे पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती माहिती टिकैत यांनी दिली.