काल दिवसभरात देशात 42 हजार 618 कोरोनाबाधितांची नोंद, तर 330 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून मोठी वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 42 हजार 618 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात 36 हजार 385 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

दरम्यान देशातील सक्रिय रुग्णांची संख्या चार लाख पाच हजार 681 एवढी आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 67 कोटी 72 लाख 11 हजार 205 डोस देण्यात आले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असून काल एकाच दिवसात त्या ठिकाणी 29 हजार 322 रुग्णांची भर पडली आहे, तर 131 जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात 4,313 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 4 हजार 360 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 86 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 04 टक्के आहे. तर राज्यात काल 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 466 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14,973 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

तसेच काल दिवसभरात मुंबईत 422 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 303 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,23,458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3532 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1446 दिवसांवर गेला आहे.