मारुती सुझुकीचा सर्वात मोठा रिकॉल; जगभरातून परत मागवल्या तब्बल एक लाख ८१ हजार कार


नवी दिल्ली – एक लाख ८१ हजार गाड्या मारुती सुझुकी परत मागवणार असून शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने केली. सियाझ, एर्टिगा, विटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि एक्सएल 6 च्या काही पेट्रोल व्हेरियंट्स परत मागवणार आहे. ४ मे २०१८ ते २७ ऑक्टोबर २०२० दरम्यान या सर्व मॉडेल्सट्या गाड्या तयार केलेल्या आहेत. या मॉडेल्सच्या १ लाख ८१ हजार ७५४ युनिट्समध्ये संभाव्य त्रुटींची तपासणी केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. मारुतीने जागतिक स्तरावर रिकॉल मोहीम हाती घेतली असून या सर्व गाड्यांमध्ये सुरक्षेसंदर्भात त्रुटी असू शकतात, असेही म्हटले आहे.

मारुती सुझुकीने ग्राहकांच्या हितासाठी, मोटार जनरेटर युनिटची तपासणी करून मोफत रिप्लेसमेंट किंवा वाहन पुर्णपणे बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉप्समधून त्रुटी असलेल्या वाहन मालकांना कळवण्यात येईल. त्याचबरोबर त्रुटी असलेल्या पार्ट्सची रिप्लेसमेंट करण्याचे काम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. वर नमूद केलेल्या मॉडेल्सची वाहने ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी ती पाण्यामध्ये चालवू नये आणि वाहनांमध्ये इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक भागांवर थेट पाण्याची फवारणी करणे टाळावे, अशी विनंती कंपनीने ग्राहकांना केली आहे.

ज्या वाहनमालकांना आपल्या कारमध्ये त्रुटी असल्याचा संशय आहे, त्यांनी कंपनीच्या www.marutisuzuki.com (for Ertiga and Vitara Brezza) तसेच www.nexaexperience.com (for Ciaz, XL6 and S-Cross) या वेबसाईटवर जाऊन ‘Imp Customer Info’ या भागाला भेट द्यावी आणि आपल्या कारमध्ये काही त्रुटी असतील ज्या तपासण्याची गरज असेल तर तिथे वाहनाचा १४ अंकी चेसिस क्रमांक टाकावा. चेसिस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड आहे आणि वाहन इनवॉईस/रजिस्ट्रेशन कागदपत्रांमध्ये देखील नमूद केलेला असतो.

उत्पादनावर सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा परिणाम होतो, त्यामुळे सप्टेंबरमध्ये कारचे उत्पादन कमी होईल, अशी शक्यता कंपनीने वर्तवली आहे. सप्टेंबरमध्ये एकूण व्हॉल्यूम साधारण उत्पादनाच्या सुमारे ४० टक्के असू शकते, असे कंपनीने मंगळवारी एक्सचेंज दाखल करताना सांगितले.