टोकियो – भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचत वैयक्तिक दुसरे पदक जिंकले आहे. तिने एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकत इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच १ स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत चीनची झांग क्यूपिंग (४५७.९) आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या.
अवनी लेखराने पॅरालिम्पिक स्पर्धेत रचला इतिहास; एकाच स्पर्धेत जिंकली दोन पदके
अवनी लेखरा पात्रता फेरीत ११७६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात बारावे पदक जमा झाले आहे. भारताला या स्पर्धेत २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदक मिळाली आहे. भारताचा पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. रियो पॅरालिम्पिक (२०१६) स्पर्धेत भारताने २ सुवर्ण पदकांसह ४ पदके जिंकली होती.
सोमवारी येथे टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अवनी लेखराने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अवनी लेखरा हिने २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक होते.
अवनी लेखराच्या कामगिरीचे कौतूक करत नेमबाज अभिनव बिंद्रा यानेही ट्वीट केले आहे. अवनीच्या कामगिरीबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहेत. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील अवनीच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी अवनीला शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे.