कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित


मुंबई – कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे दुरावलेले प्रवासी, त्यातच इंधनाची दरवाढ इत्यादी कारणांमुळे मागील वर्षभरापासून एसटी महामंडळ आर्थिक संकटात असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. तारीख उलटूनही पगार हाती न आल्यामुळे घरखर्च भागवण्याची मोठी समस्या कर्मचाऱ्यांसमोर आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ६०० कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित करण्यात आल्यामुळे राज्यभरातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.

एसटी महामंडळाला आधीच चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर कोरोना संकटामुळे परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५०० कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश दिले व त्यानुसर तातडीने निधी वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.