यामुळे ४६ दिवसात व्हॉट्सअ‍ॅपने बंद केली तब्बल ३० लाख अकाऊंट


नवी दिल्ली – आपल्या देशातील जवळपास ५५ कोटी नागरिक व्हॉट्सअ‍ॅप या इंस्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपही अन्य कंपन्यांच्या सोशल मीडिया अ‍ॅपप्रमाणे नव्या आयटी नियमाअंतर्गत येते. या कायद्यानुसार प्रत्येक महिन्याला भारतातील सोशल मीडिया कंपन्यांना यूजर्स सेफ्टी रिपोर्ट सरकारला द्यावा लागतो. व्हॉट्सअ‍ॅपने दाखल केलेल्या रिपोर्टमध्ये जून-जुलै दरम्यान ३० लाखाहून अधिक अकाऊंटवर कारवाई केल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई ऑनलाइन स्पॅम आणि गैरवर्तनाविरोधात करण्यात आली आहे. फॉरवर्ड मेसेजेससाठी अ‍ॅपच्या गैरवापरसह विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास ३० लाख २७ हजार अकाऊंट जूनपासून जुलैपर्यंत बंद केली आहेत. या अकाऊंटबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ऑटोमॅटिक टूलद्वारे कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत ३१६ खाती ब्लॉक करण्यात आली आहेत.

ही कारवाई युजर्सच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. तर ७३ खात्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. युजर्सकडून ४६ दिवसात ५९४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ३१६ अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव इतर अकाऊंटच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप मीडिया प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तन शोधण्यासाठी ऑटोमॅटिक टूल आहे. जर तुम्हालाही कोणत्या अकाऊंटबाबत तक्रार असेल तर [email protected] या ईमेलवर मेल करू शकता किंवा अ‍ॅपमधूनच खाते ब्लॉक करू शकता अन्यथा तक्रार करू शकता, असे व्हॉट्सअ‍ॅपने याआधीच सांगितले आहे.

दुसरीकडे नव्या आयटी कायद्यानुसार फेसबुकनेही ३३.३ दशलक्ष कंटेंटवर कारवाई केली आहे. १६ जूनपासून ३१ जुलै या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. तर इन्स्टाग्रामने २.८ दशलक्ष अकाऊंटवर कारवाई केली आहे.