जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अप्रत्यक्षरित्या टीका


ठाणे – नारायण राणे विरुद्ध शिवसेना या विषयावरुन राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसात ढवळून निघाले आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नारायण राणे यांना झालेल्या अटक व सुटकेची चर्चा झाली. आज या प्रकरणाला एक आठवडा पूर्ण झाला असला, तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दीक चकमक काही संपत नाही. मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायम्वरूपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या टीका केली.

जनता जगली काय, मेली काय? आम्हाला फक्त १०० टक्के राजकारण करायचे आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका समोर व्यक्त केला जात असताना सुद्धा आम्हाला यात्रा काढायच्या आहेत. आम्हाला नवीन सोयी सुविधा जनतेसाठी करायच्या नाहीत. पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील, असे सभा समारंभ करायचे आहेत. का तर, आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजेत. कशाला आशीर्वाद?, जनतेचे जीव धोक्यात घालायला. या सर्व घाणरड्या राजकारणापासून बाजूला राहून आपण सगळेजण जनतेच्या हिताची कामे करत आहोत. त्याबद्दल मी तुमचे कौतुक करतो, अशी अप्रत्यक्षरित्या टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेवर केली.

काही काळासाठी आपण दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला मुकलो आहोत, याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवतात. पण आज गर्दी करून उत्सव साजरा करण्यासारखी परिस्थिती नाही. जगभर कोरोनाचे संकट पसरले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, हेच केंद्र सरकारनेही सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी, असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.