सत्तेच्या गैरवापराबद्दल आपल्या वडिलांना विचारावे, चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला


नागपूर – शिवसेनेसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांना नारायण राणेंच्या अटकनाट्यामुळे डिवचल्या गेलेल्या भाजपने चांगलंच धारेवर धरल्याचे दिसून येत आहे. ईडीचा ससेमिरा शिवसेना खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मागे लागल्यानंतर सत्ताधारी पक्षांतून भाजपने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याची भावना उमटत आहे. आमच्या नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही बोलून दाखवले होते. त्यावरुनच आता सुप्रिया सुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

त्यांनी नागपुरात बोलताना शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मधील लोकांना ईडीचा फायदा होणार असेल वाटत असेल तर त्यांनी पेढे वाटावे. सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की सत्तेचा गैरवापर या आधी एवढा कधीच झाला नाही, तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावे की सत्तेचा गैरवापर इंदिरा गांधी यांनी कसा केला.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या धोक्यातही लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा काढणे चालूच आहे, जनतेचा जीव धोक्यात घालत असल्याची अप्रत्यक्ष टीका केली. पाटील त्याला प्रत्युत्तर देताना म्हणाले, जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री काहीही बोलू शकतात, कोकणात जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांना याची दखल घ्यावी लागली. तर चंद्रकांत पाटील शिवसेनेवर टीका करताना पुढे म्हणाले, शिवसेना ही हिंदुत्ववादी होती, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही. असती तर त्यांनी टिपू सुलतान जयंती साजरी केली नसती.