टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत ‘सुवर्णवेध’ घेणाऱ्या अवनी लेखरासह विजेत्या खेळाडूंचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन


मुंबई :- टोकियो येथे सुरु असणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरुन अवनी लेखरा भारतासाठी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. त्याचबरोबर थाळीफेक प्रकारात योगेश कथुनियाने रौप्यपदक तर भालाफेक प्रकारात देवेंद्र झाझारियाने रौप्यपदक आणि सुंदरसिंग गुर्जरने कांस्य पदक जिंकले. श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी भारतासाठी पदकांच्या विजयाची हंडी फोडणाऱ्या सर्व विजेत्या खेळाडूंचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्यासह अवनी लेखराने नवे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा प्रस्थापित केले. थाळीफेक प्रकारात योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले. त्याचबरोबर भालाफेक प्रकारात देवेंद्र झाझारियाने रौप्यपदक आणि सुंदरसिंग गुर्जरने कांस्य पदक जिंकत पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदकांची लयलूट केली आहे. टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंनी पदके जिंकत देशाची मान उंचावली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केलं आहे, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.