काल दिवसभरात 42,909 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 380 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोकेवर काढू लागले आहे. जगातील सर्व दैशांपैकी सर्वाधिक कोरोनाबाधित काल दिवसभरात भारतात आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 42,909 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 380 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच काल दिवसभरात 34,763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

यासंदर्भात वर्ल्डोमीटर वेबसाईटने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात काल दिवसभरात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. काल दिवसभरात अमेरिकेत 37262, ब्रिटनमध्ये 33196, इराणमध्ये 31516, तर जपानमध्ये 22748 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रशिया, मेक्सिको, इराण, इंडोनेशियात भारताहून कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संकटाच्या सुरुवातीपासून एकूण तीन कोटी 27 लाख 37 हजार रुग्णांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 कोटी 19 लाख 23 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 76 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात काल दिवसभरात 4,666 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 510 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 62 लाख 63 हजार 416 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. तसेच राज्यात काल दिवसभरात 131 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 52 हजार 844 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,503 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

काल दिवसभरात मुंबईत 345 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत काल दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3036 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1611 दिवसांवर गेला आहे.