अनिल देशमुख व अनिल परब यांना तुरूंगात जावेच लागणार – किरीट सोमय्या


मुंबई – मंत्री असतानाही अनिल परब यांनी बेकायदेशीर रित्या रिसॉर्ट बांधले व ते माझे असल्याचं सांगून त्याचा मालमत्ता कर देखील भरला. बेकायदेशीर बांधकाम मंत्री महोदय स्वत: करतात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे त्यांना वाचवण्याचे पाप करत आहे. तर, अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईचे आदेशही दिले गेले आहेत. त्यानंतरही एखादा मंत्री मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? मंत्रिमंडळातून अनिल परबची ताबडतोब हकालपट्टी करा, ही आमची मागणी असल्याचे आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत म्हटले आहे. याचबरोबरत अनिल देशमुख व अनिल परब यांना तुरूंगात जावेच लागणार असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी बोलून दाखवले.

परिवहनमंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. मंगळवारी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे, असे नोटिशीत म्हटले आहे. तर, आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात पत्रकारपरिषद घेत, अनिल परब व ठाकरे सरकार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

किरीट सोमय्या यावेळी म्हणाले की, अनिल परब यांनी बनाव केला, टाउन प्लानिंगने १२ ऑक्टोबर २०१७ रोजी कळवल्यानंतर अनिल परबने रिसॉर्ट बांधला. विना परवनगी बांधकाम केले, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. जो फोर्ज परवाना त्यांना मिळाला होता, तो ५०० मीटरचा (५ हजार फूट) होता, त्यांनी १७ हजार ८०० स्क्वेअर फूट बांधकाम केले. मुख्य मुद्दा असा आहे की २६ जून २०१९ रोजी अनिल परब यांनी ग्रामपंचायतीला पत्र लिहिले होते, की हे बांधकाम हे रिसॉर्ट माझे आहे. त्यांनी स्वतः २०१९-२० आणि २०२०-२१ चा मालमत्ता कर भरलेला आहे. त्यांच्या नावाने पावती आहे, त्यांच्या खात्यातून पैसे देण्यात आले. हा मालमत्ता कर १७ डिसेंबर २०२० रोजी भरला.

तसेच, महाराष्ट्र सरकाला एका सीएने अधिकृतरित्या अहवाल दिला, की हे रिसॉर्ट बांधण्यात ५ कोटी ४२ लाख ४४ हजार २०० रुपये खर्च झाले आहेत. अनिल परब यांनी एक दमडीचा खर्च देखील स्वतःच्या खात्यात दाखवलेला नाही. मग रिसॉर्ट बांधण्याचा पैसा कुठून आला? सचिन वाझेचा वसुलीमधील पैसा होता का? किरीट सोमय्यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर अनिल परब यांनी स्वतःच्या मित्राला, सदानंद कदमच्या नावाने हा रिसॉर्ट १ कोटी रुपयात करून टाकला. बांधकामाचा खर्च ५ कोटी ४२ लाख बाजारभाव ग्रामपंचायतीनुसार २१ कोटी आणि १ कोटीत अॅग्रीकल्चर लेन म्हणून विकल्याचे सोमय्या यांनी कागदपत्रांच्या आधारे सांगितले.

याचबरोबर, आम्ही अनिल परबच्या विरोधात बेनामी मालमत्ता कायद्यानुसार तक्रार दाखल केली आहे. मनी लॉण्ड्रिंग झाले आहे, ५ कोटी ४२ लाख खर्च केले आहेत, पण ते व्हाईटमध्ये दाखवले नाहीत म्हणून ईडीकडे तक्रार केलेली आहे. पर्यावरण मंत्रालय एमसीझेडमध्ये पाठपुरावा सुरू आहे आणि राष्ट्रीय हरित प्राधिकरणात सुनावणी सुरू झालेली आहे. माझी मागणी आहे, ईडीने बेनामी संपत्ती कायद्यानुसार, मनी लॉण्ड्रिंगमध्ये याची चौकशी केली पाहिजे. दुसरी बाब मंत्र्याने बेकायदेशीर बांधकाम केले आहे, त्यावर कारवाईचे आदेशही दिल्या गेले आहेत. त्यानंतरही मंत्रिमंडळात मंत्री कसा राहू शकतो. मंत्रिमंडळातून अनिल परबची ताबडतोब हकालपट्टी करा, ही आमची मागणी असल्याचेही यावेळी किरीट सोमय्या म्हणाले.