हवामान विभागाचा राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली होती. पण राज्यात आता उद्यापासून चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ३० ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील हवामानात पावसाने विश्रांती घेताच झपाट्याने बदल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीपुढे गेले असून, काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडयातही अचानक वाढ झाली आहे. राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती.