राणे विरुद्ध शिवसेना वादावर सुप्रिया सुळेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया


नागपूर – राज्यातील राजकारणामध्ये सोमवार सायंकाळपासून सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या राणे विरुद्ध ठाकरे वादावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर सुप्रिया सुळे आहेत. सुळे यांनी आपल्या दौऱ्यासंदर्भातील माहिती देताना पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेसंदर्भात यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अगदी मोजक्या शब्दात या प्रश्नाला उत्तर देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि सुटका या प्रकरणासंदर्भात विचारताना पत्रकारांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना झालेली अटक आणि नंतर होणारी वक्तव्य पाहाता कुठेतरी मोदी सरकारचा दबाव राज्यावर आहे, असे वाटते का असा प्रश्न सुळे यांना विचारण्यात आला. सुळे यांनी या प्रश्नावर उत्तर देताना अगदी मोजक्या शब्दात आणि सावध प्रतिक्रिया नोंदवली. मी काही दिल्लीला गेलेले नाही, मला फारसे माहित नसल्याचे सुप्रिया सुळे या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. नंतर परत एका पत्रकाराने राणे प्रकरणावरुन सुरु असणाऱ्या राजकारणावर तुमचे काय मत असल्याचे विचारले असता सुप्रिया सुळे यांनी, मला याबद्दल काहीही माहित नसल्याचे म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी राज्यामधील सरकारसंदर्भात बोलताना महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्षे नाही तर २५ वर्षे राज्याची सेवा करेल, असे मत व्यक्त केले. त्यांना पत्रकारांनी भाजप आणि शिवसेनेसंदर्भातील प्रश्नही विचारला. आम्ही राजकीय विरोधक असून वैरी नसल्याचे भाष्य दोन्ही पक्षांकडून केले जात असून दोन्ही पक्षांचे सूर बदलताना दिसत असल्याचे सांगत एक प्रश्न विचारण्यात आला. तर दुसऱ्या एका प्रश्नामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शुक्रवारी रात्री भेट झाल्याचे कळते, असा प्रश्न विचारण्यात आला.

सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नावर उत्तर देताना मी इम्पल्सीव्ह नाही. एखाद्या गोष्टीवर मी लगेच कमेंट करत नाही. विचार करण्यासाठी मी थोडा वेळ घेते आणि मग बोलते. मी विचार करुन बोलते त्यामुळे मी लगेच प्रतिक्रिया देणार नाही. तसेच विचारधारा सोडून एकमेकांसोबत चांगले संबंध असतील, तर मी त्याचे स्वागतच करेन. जे संस्कार माझ्यावर झाले आहेत त्याला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याचा वारसा आहे. सर्वच पक्षांशी त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळेच मी अशा भेटी होत असतील आणि राजकीय विचारसरणी बाजूला ठेऊन भेटीगाठी होत असतील, तर मी त्याचे स्वागतच करेन असेही सुप्रिया म्हणाल्या.

नागपूरमधील राष्ट्रवादी कार्यकारणीची मागील अनेक महिन्यांपासून बैठक झाली नाही आणि अनेकांच्या भेटी झाल्या नसल्यामुळेच मी दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून पुढील दोन दिवसांमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने पक्षासंदर्भातील महत्वाचे निर्णय आणि कामे हातावेगळी करण्याचा विचार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.