तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा डावाने पराभव


लीड्स – इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेतला आहे. भारताचा दुसरा डाव सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात २७८ धावांवर आटोपल्यामुळे या कसोटीत इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. काल दिवसअखेर शतकाच्या उंबरठ्यावर असलेला पुजारा आणि अर्धशतकवीर विराट कोहली आज लवकर माघारी परतले. ६५ धावांत ५ बळी घेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने भारताच्या डावाला खिंडार पाडले. विशेष म्हणजे मागील काही काळापासून फॉर्म हरवलेल्या चेतेश्वर पुजाराच्या शतकाकडे सर्वांच्या नजरा होत्या. पण आज खेळ सुरू झाल्यानंतर रॉबिन्सनने पुजाराला पायचित पकडले. १५ चौकारांसह ९१ धावांची खेळी करून पुजारा माघारी परतला. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

दरम्यान काल भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर केएल राहुलला जलदगती गोलंदाज क्रेग ओव्हर्टनने वैयक्तिक आठ धावांवर माघारी धाडले. रोहितने चेतेश्वर पुजारासोबत उपाहारानंतर किल्ला लढवायला सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी फलकावर लावली. रोहितने ३८व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला आधार दिला. चहापानानंतर रोहितला ओली रॉबिन्सनने तंबूचा मार्ग दाखवला. त्याने रोहितला पायचित पकडले. रोहितने ७ चौकार आणि एका षटकारासह ५९ धावा केल्या. रोहितनंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. त्याने पुजारासोबत धावा जमवल्या. या दोघांनी कोणताही दबाव न घेता फटकेबाजी केली.

चेतेश्वर पुजाराला चौथ्या दिवशी एकाही धावेची भर घातला आली नाही. ओली रॉबिन्सनने पुजाराला पायचित पकडले. पुजारा १५ चौकारांसह ९१ धावांची खेळी केली. पुजारानंतर अजिंक्य रहाणे विराटची साथ द्यायला मैदानात आला. विराटने अर्धशतकी टप्पा ओलांडल्यानंतर तंबूचा मार्ग धरला. त्याला रॉबिन्सनने वैयक्तिक ५५ धावांवर बाद केले. त्याच्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेही (१०) अँडरसनचा बळी ठरला. त्यानंतर आलेले ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी आणि इशांत शर्माही चमत्कार दाखवू शकले नाहीत.