उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक; आशिष शेलार


रत्नागिरी – भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्या लोकमान्य टिळकांना ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक असल्याचे म्हणत भाजप नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आजपासून रत्नागिरीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली असून आमदार आशिष शेलार यांनी रत्नागिरी जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझे, कुटुंब माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. त्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. तर त्याकाळी उद्धव ठाकरे यांनी सुरेश प्रभू यांना सुध्दा अपमानास्पद वागणूक दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झाले, अन्य नावे मी घेत नाही. तर आता केंद्रीय मंत्रीपद नारायण राणे यांना मिळाले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोकणाला काही मिळाले की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखते? असा सवाल करत याचा संताप कोकणवासीयांमध्ये आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

उध्दव ठाकरे हेच महाराष्ट्रात असहिष्णुतेचे जनक आहेत. वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहिले म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एक व्यंगचित्र एका निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांनी फॉरवर्ड केले म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला, तर अभिनेत्री कंगना यांचे घर तोडण्यात आले. सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केली. आज जे असहिष्णुतेचे हे वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे, त्याचे जनक उद्धव ठाकरे हेच असल्याचे म्हणत शेलार यांनी टीका केली.