सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या मागणीनंतर नितेश राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार


सिंधुदुर्ग : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा, अशी मागणी केल्यानंतर आता शिवसेना आणि संजय राऊतांवर भाजप आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.

नितेश राणे यांनी म्हटले आहे की, ही चांगली गोष्ट आहे, त्याचा तपास लवकर करावा. येवढा उशीर संजय राऊत का लावतात हे आम्हालाच कळलेले नाही. शिवसेना 2014 पासून सत्तेत आहे. दीपक केसरकर 2014 ते 2019 दरम्यान दगृहमंत्री होते. शिवसेना आता पण सत्तेत आहे. ज्यांची चमचेगिरी संजय राऊत करतात, गृहखाते त्या पवार साहेबांकडे असल्यामुळे मला कळत नाही की ते सामनामधून असे आव्हान का देत आहेत. राज्याची सत्ता त्यांच्याकडे आहे. त्यांनी तपास करावा. मला हरकत नसल्याचे नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे म्हणाले की, त्याचबरोबर संजय राऊतांना मला ही विनंती करायची आहे, या सर्व केसेस तुम्ही उघडत असताना, जरा गेल्या 4 महिन्यापासून नंदकिशोर चतुर्वेदी हे का गायब आहेत, याची पण चौकशी झाली पाहिजे. राज्यात काही लोक गायब होत आहेत. त्यामध्ये नंदकिशोर चतुर्वेदी आहेत. ते कोणाचे पार्टनर आहेत. आताच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील कुठल्या मंत्र्यांचे 2019 मध्ये ते पार्टनर होते. या सर्वांची चौकशी संजय राऊत यांनी केली, तर त्याही कुटुंबाला थोडा आधार भेटेल, असे नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश असो किंवा अडचणी आणण्याचे काम मुंबईपासून सुरू आहे. आमच्यासाठी हे काय नवीन नाही. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला फार डोकेदुखी झाली आहे. आम्हाला जे काही करायचे ते उद्या करू. पण उद्यापासून सुरू होणारी जन आशीर्वाद यात्रेतील उत्साहात कुठेही कमी होणार नाही. त्याच ताकतीने आणि उत्साहाने नारायण राणेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करणार असल्याचे ते म्हणाले.

नितेश राणे म्हणाले की, राज्यात किती काम कायद्याला धरून झाले, किती कायदा पाळला गेला हे न्यायालयानेच सांगितले आहे. म्हणून तर आम्हाला जो जामीन मिळाला, तो त्यामुळेच मिळालेला आहे. कायदा पाळला गेला नाही, राजशिष्टाचार पाळला गेला नसल्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले असल्याचे ते म्हणाले.