ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; सेवेत असताना अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी


मुंबई – राज्यातील अधिकारी वर्गाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा बैठकीत घेण्यात आला. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे की, हे अनुकंपा धोरण गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील लागू करावे.

अनेक अधिकाऱ्यांचे कोरोनाकाळात निधन झाले असून हे अनुकंपा धोरण लागू करण्याची अधिकारी संघटनांची देखील मागणी होती. या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला

राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. त्याचबरोबर अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आल्यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.