राहुल गांधींच्या टीकेवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा पलटवार


नवी दिल्ली – मोदी सरकारवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेनंतर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी ७० वर्षांच्या काळात यूपीए सरकारने उभ्या केलेल्या सर्व गोष्टी भाजप सरकार विकत असल्याचा आरोप केल्यानंतर राहुल यांचा अमेठीमध्ये पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांनी म्हटले आहे कि, खासदार राहुल यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देखील अमेठीमध्ये एक जिल्हा रुग्णालयही बांधले नाही. तर दुसरीकडे मोदी सरकारने कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी पीपीई किटपासून अन्य आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहे. राहुल गांधींची समस्या फक्त ही आहे की या निर्गुंतवणुकीतून त्यांना ६ लाख कोटी रुपये येतील. म्हणूनच त्यांना त्रास होत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या कामातून महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने ८,००० कोटी रुपयांची कमाई केली होती. आम्ही राहुल गांधी यांच्या आरोपाचा आता असा अर्थ लावायचा का राज्य सरकारने ते विकले आहे?”, असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने नवी दिल्ली रेल्वे स्थानकासंदर्भात २००८ मध्ये आरएफपी जारी केला होता. विमानतळाचे खासगीकरण २००६ मध्ये सुरू करण्यात आले होते. मग आपल्या आईच्याच नेतृत्वाखालील सरकारने रेल्वे, रस्ता आणि विमानतळ विकले, असा राहुल गांधी यांचा आरोप आहे का?” असा सवाल देखील स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारचा राजकीय चेहरा म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाहिले जायचे, याच संदर्भाने हे विधान करण्यात आले आहे.

देश भाजप सरकारच्या कार्यकाळात गुलामीच्या दिशेने वाटचाल करत आहे, या राहुल गांधी यांच्या आरोपाला उत्तर देताना स्मृती म्हणाल्या की, देशात खरे गुलाम तर ते आहेत, जे कौटुंबिक राजवटीसाठी देश तोडण्याची भाषा करतात. स्मृती इराणी यांचा यावेळी रोख पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या दोन सल्लागारांनी काश्मीर आणि पाकिस्तानबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याकडे होता.