नारायण राणेंच्या वक्तव्याचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून समर्थन


पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी कालचा दिवस हा महत्वाचा दिवस होता. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आणि त्यावरुन मंगळवारी राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. भाजप देखील नारायण राणे यांच्या समर्थनार्थ उतरली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वाक्य चुकलेले नाही. थोबाडीत मारली असती, हा कॉमन संवाद आहे. जर एखादी गोष्ट चुकली, तर राणेंना आणि त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी व्यवस्था असल्याचे म्हणत राणे यांच्या वक्तव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केले आहे. ते यावेळी म्हणाले की, फुग्याला भोक तुमच्या पडले आहे, तुमच्या सामनाला किंमत देत नाही. राऊत साहेब तुमच्यावर देखाली आरोप झाले आहेत, त्याचे पण बघा, असा सवाल पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, काल दिवसभरात झालेला राजकीय कलगीतुरा सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झाले. आता राणेंना मोकळीक दिली, जामीन दिला. दोनदा एसपीकडे हजेरी लावण्यास सांगितले. त्यांना नोटीस दिली आणि बोलताना भान राखले पाहिजे, असे सांगण्यात आले. शेवटी विजय सत्याचा झाला आहे. राज्य सरकार सारखे न्यायालयाच्या थपडा खात असल्याचेही पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले की, राणेंना मुंबईत प्रतिसाद मिळाला, मुंबई हरली तर? मुंबईत पोपटाचा प्राण आहे. भाजप मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करत नाही. राणेंची तब्येत खराब झाली, ते जेवत असताना त्यांच्याकडून ताट हिसकावून घेतले हे अमानवीय आहे. पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवले, त्यामुळे एक दिवस आराम करतील आणि लवकरच जन आशीर्वाद यात्रा निघेल.

आमच्या वेळीच कायदा सुव्यवस्था प्रश्न बरा निर्माण होतो. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चालते आहे. सगळे ड्राफ्टिंग झाले असून लवकरच परब यांच्या विरोधात याचिका दाखल केली जाईल. सगळी क्लिप राज्याने पाहिली असल्याचेही ते म्हणाले.