नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांच्यावरील कारवाईबाबत दिली माहिती


नाशिक – महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात नाशिकमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले होते. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलातना याबाबतची माहिती दिली.

याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले, सायबर पोलीस स्टेशन नाशिक शहरात जो गुन्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नोंद झाला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी जे पथक गेले होते. ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी पोहचले होते आणि तिथे पोहचल्यानंतर पथकाला समजले की, रत्नागिरी पोलीस नारायण राणेंना ताब्यात घेऊन गेले आहेत आणि महाड येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या संदर्भात त्यांना न्यायालयात हजर केले जाणार होते. काल रात्री उशीरापर्यंत या प्रकरणाची सुनावणी चालली.

न्यायालयाकडून जेव्हा नारायण राणेंना जामीन देण्यात आला व त्यामध्ये अशी अट टाकण्यात आली की या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही, मग त्यानंतर नाशिक पोलिसांनी देखील भूमिकेत बदल करून नारायण राणेंना २ सप्टेंबर रोजी, दुपारी १२ वाजेच्या आत पोलीस स्टेशनला येऊन त्यांचा जबाब नोंदवण्याची विनंती केलेली आहे. या गोष्टी केंद्रीयमंत्री राणेंनी मान्य केल्या आहेत.त्यामुळे अशी अपेक्षा आहे की नारायण राणे हे २ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये येतील व तपास प्रक्रियेत सहभागी होतील.