भारतातील एकूण लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक प्रमाणातील नागरिक विषाणूसह जगायला शिकले आहेत ; WHOच्या शास्त्रज्ञांचा दावा


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. सध्या भारतात कोरोनाचा स्थानिक स्तरावर प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्यामुळे कमी किंवा मध्यम पातळीच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे, असे स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. स्थानिक पातळीवरील संसर्ग म्हणजे जेव्हा एकूण लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक प्रमाणातील नागरिक विषाणूसह जगायला शिकतात असा टप्पा. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे म्हटले तर कोरोनासोबत जगणे भारतीयांच्या अंगवळणी पडत आहे.

स्वामीनाथन कोव्हॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी देण्यात आल्यानंतरच्या टप्प्याबद्दल बोलताना यांनी, मला पूर्ण विश्वास आहे की कोव्हॅक्सिनला त्याच्या अधिकृत लसींपैकी म्हणून एक मंजूर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेचा तांत्रिक गट तयार असेल आणि हा निर्णय सप्टेंबरच्या मध्यापर्यंत होऊ शकतो.

स्वामीनाथन ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की, आपण बहुधा स्थानिक पातळीच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत, जिथे कमी किंवा मध्यम पातळीचा प्रसार आहे. आता आम्हाला काही महिन्यांपूर्वी दिसलेली बाधितांच्या संख्येतील प्रचंड वाढ आणि तशी एकंरदरित परिस्थिती सध्या दिसत नाही. भारताचे आकारमान आणि लोकसंख्येची विविधता आणि देशाच्या विविध भागांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची स्थिती पाहता, ही परिस्थिती खूपच व्यवहार्य आहे आणि अशीच परिस्थिती कायम राहू शकते. तसेच देशाच्या विविध भागांमध्ये रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळू शकतो.

२०२२ च्या अखेरीस पर्यंत भारत ७० टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य करण्याच्या स्थितीत आहे. हे लसीकरण झाल्यानंतर देशात परिस्थिती सामान्य होईल, अशी आशा स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे. मुलांमध्ये कोरोनाच्या प्रसारावर स्वामीनाथन म्हणाल्या की, पालकांनी घाबरण्याची गरज नाही. सेरो सर्वेक्षण आम्ही पाहत असून इतर आपण देशांकडून जे शिकलो त्यातून असे दिसते की मुलांना संसर्ग होण्याची शक्यता असली तरी बहुतेक मुलांना सुदैवाने अतिशय सौम्य प्रकारचा संसर्ग होतो.

त्या उपचारासाठी रेमडेसिविर, एचसीक्यू किंवा इव्हरमेक्टिन सारख्या औषधांचा वापर करण्यावर म्हणाल्या की, आजपर्यंत असे कोणतेही पुरावे नाहीत की एचसीक्यू किंवा इव्हरमेक्टिनच्या वापरामुळे संक्रमित लोकांचा मृत्यू किंवा रुग्णसंख्या कमी करण्यात किंवा प्रत्यक्षात लोकांना लागण होण्यापासून रोखण्यात यश आले आहे. म्हणून उपचार किंवा प्रतिबंधासाठी यापैकी कोणत्याही औषधांचा वापर करण्याची शिफारस करता येईल, अशी कोणतीही कारणे सध्या उपलब्ध नाहीत.