मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवणार भाजप


मुंबई – राज्याच्या निरनिराळ्या विभागांमध्ये सध्या भाजपतर्फे जन आशीर्वाद यात्रा सुरू आहेत. त्यापैकी १९ ऑगस्टला कोकण विभागाची यात्रा मुंबईहून सुरू झाली. ती सोमवारी महाडमध्ये आली असता तेथील पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा त्यावेळी त्यांनी संदर्भ दिला. यंदाचा स्वातंत्र्यदिन हीरक महोत्सव की अमृत महोत्सव अशी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली, तेव्हा त्या ठिकाणी मी असतो, तर कानाखाली लगावली असती, असे आक्षेपार्ह वक्तव्य राणे यांनी केले. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर पोलिसांनी काल राणे यांना अटक केली होती.

दरम्यान, पत्रकार परिषद घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. नारायण राणे यांना केलेली अटक हे बेकायदेशीर होती. अटकेचे आदेश अनिल परब यांनी दिले होते, ते गृहमंत्री आहेत का? त्यामुळे शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचे आम्ही वर्तमान पत्रात वाचले आहे. राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद असतांना अनिल परब घूसखोरी कशी करतात, असे आशिष शेलार म्हणाले.

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ७५ हजार पत्र लिहिणार असून हा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. कृपया लक्षात ठेवा, असे पत्राचे स्वरुप असणार आहे, असे भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच संयमी शरद पवार यांच्यासोबत राहूनही शिवसेनेचे हे संकुचित राजकारण असल्याची टीका देखील शेलार यांनी केली.

नारायण राणेंचा जो जामीन अर्ज निकाली निघाला, तो अर्ज आधीच रद्द होणार असल्याचे अनिल परब सांगतात, याचा अर्थ या सगळ्या प्रक्रियेत मंत्र्यानी दलालांमार्फत हस्तक्षेप केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अनिल परब आणि सबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.