काल दिवसभरात 25,467 नव्या रुग्णांची नोंद, तर 354 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप म्हणावे तसे कमी झालेले नसून देशभरातील नव्या कोरोनाबाधितांची मोठी आकडेवारी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 25 हजार 467 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 354 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 39 हजार 486 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे 58.82 कोटी डोस देण्यात आले असून त्यामधील पहिला डोस घेतलेल्या किमान 1.6 कोटी लोकांना 16 आठवड्यांच्या आत दुसरा डोस मिळाला नसल्याचे समोर आलं आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. उरलेल्या नागरिकांमध्ये 45 वर्षांवरील नागरिकांची संख्या जास्त आहे.

दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात 3,643 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 38 हजार 794 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.05 टक्के आहे. राज्यात काल 105 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे.

तसेच काल तब्बल 43 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 49 हजार 924 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11,746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नंदुरबारमध्ये रुग्णसंख्या शून्यावर आहे. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.