प्रमोद जठार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांशी नारायण राणेंच्या तुलनेवरुन अंजली दमानिया यांनी लगावला टोला


मुंबई – महाराष्ट्र पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ताब्यात घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याच्या राणेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे.

कोणत्याही अटक वॉरंटशिवाय भाजप नेते आणि कोकणामधील जन आशिर्वाद यात्रेचे समन्वयक प्रमोद जठार यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नारायण राणे संगमेश्वरला पोहोचले असल्याचे म्हटले होते. राणेंना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांवर प्रचंड दबाव आहे आणि त्यांना ५ मिनिटात अटक करण्यास सांगितले असल्याचे जठार यांनी म्हटले होते. त्यानंतर नारायण राणे यांना ताब्यात घेत अटक केली.

यावर याच संगमेश्वरात संभाजी महाराजांनासुद्धा अटक झाली होती आणि आणि औरंबगजेबचे सरकार पडल्याची प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी दिली. पण आता संभाजी महाराजांशी नारायण राणेंची तुलना केल्यामुळे समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जठार यांच्यावर टीका केली आहे.

आजच्या दिवसापुरती जन आशीर्वाद यात्रा थांबलेली आहे. आता आंदोलनात यात्रेचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. नारायण राणेंची जोपर्यंत सुटका होत नाही, तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात भाजप आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक लक्षात घ्यावे याच संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा अटक झाली आणि औरंगजेबाचे सरकार संपले होते. त्यामुळे या महाराष्ट्रात या सरकारचं थडगे उभे केल्याशिवाय भाजप राहणार नसल्याची प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


ट्विटरवरुन जठार यांच्यावर दमानिया यांनी निशाणा साधला आहे. नारायण राणेंच्या अटकेवर प्रमोद जठार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा संगमेश्वरला अटक झाली होती? कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे…, असा टोला दमानिया यांनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना दमानिया यांनी, काहीही बोलायचे…. कहा राजा भोज और कहा गांगु तेली, असे म्हटले आहे.