मानसिक संतुलन बिघडलेल्या नारायण राणेंना ठाण्याला पाठवून शॉक दिले पाहिजे – गुलाबराव पाटील


मुंबई – काल महाड येथील पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर, राज्यातील राजकीय वातावरण देखील कमालीचे तापले आहे. राणेंच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत, राज्यभर आंदोलनं सुरू केली. तर भाजप कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. विविध राजकीय नेत्यांच्या या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया येत आहेत, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी देखील नारायण राणेंवर पुन्हा एकदा गंभीर टीका केली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, यात्रा काढणे हा त्यांचा अधिकार होता, यात्रा काढण्याबद्दल कुणाचेही दुमत नव्हते. प्रत्येक पक्षाने यापूर्वी देखील आपल्या परीने यात्रा काढलेल्या आहेत. पण त्यांनी जे वक्तव्ये केले होते ते कोणत्याही लोकशाहीमध्ये झालेल्या घटनेत सगळ्यात वाईट घटना त्यांनी त्या दिवशी केली. यापूर्वी आपण जर यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार, देवेंद्र फडणवीसांपर्यंत इतर आदर्श नेत्यांची नावे आपण पाहिली, तर कोणत्याही नेत्याने अशा पद्धतीचं वक्तव्य केलंे नव्हते.

नारायण राणे सारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केलं. मला तर असे वाटते की मी कालही जे बोललो आणि आजही जे सांगतो, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना ठाण्याला पाठवून शॉक दिले पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांची तपासणी करून, त्यांना पक्षाच्या कामासाठी आजची रथयात्रा जी सुरू झाली आहे, त्या यात्रेला थांबवून पुन्हा ती सुरू करण्यासाठी मला तरी वाटते की, त्यांची चाचणी व्हावी. त्यांना आज अटक झाली हे चागंले काम झाले. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा जर असेल, तरी तो मुख्यमंत्री हा कोणत्याच पक्षाचा नसतो, तो मुख्यमंत्री १२ कोटी जनतेचा आहे. त्या पदाचा मान राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने केलेली कारवाई योग्य असल्याचे मला वाटते.