रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणेंना अटक


रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचे वक्तव्य चांगलेच भोवले आहे. रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. पण नंतर त्यांना अटक करुन गाडीतून नेण्यात आले.

नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. अखेर पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.

नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात गुन्हे रद्द करण्याच्या आणि अटकेपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी केली होती. नोटीस न देताच अटकेच्या कारवाईचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. पण योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश न्यायालयाने वकिलाला देत तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता.