उद्धव ठाकरेंना जे करायचे आहे, ते करू दे, मला जे करायचे आहे ते मी करेन; अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया


मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी अटकेनंतर टाइम्स नाऊशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यामध्ये अटक झाली तेव्हा काय काय घडले हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलही वक्तव्य केले आहे.

या वृत्तवाहिनीला अटक झाल्यानंतर व्हि़डीओ कॉलच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना नारायण राणेंना उद्धव ठाकरेंना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणेंनी, उद्धव ठाकरेंना जे करायचे आहे, ते करू दे, मला जे करायचे आहे ते मी करेन, असे उत्तर दिले. राणेंना मुलाखत घेणाऱ्या माहिलेने उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे?, असे विचारले असता राणेंनी कुछ नहीं कहुंगा… असे म्हणत एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंना जे करायचे आहे, ते करू दे, मला जे करायचे आहे, ते मी करेन, असे उत्तर दिले आहे.

नारायण राणेंनी यावेळी अटक झाली तेव्हा नक्की काय घडले याबद्दलही भाष्य केले आहे. मी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत असल्याचे मला सांगितले. त्यांना मी नोटीस दाखवा असे म्हटले. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन येथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणल्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. त्यांचा हेतू मला चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले. आता मला कोकणातील महाड येथे नेले जात असल्याचे राणे म्हणाले.

तुम्ही ते वादग्रस्त वक्तव्य करुन चूक केली असे वाटते का?, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर राणेंनी, मी कानाखाली मारेल, असे म्हणालो नव्हतो. हा कितवा १५ ऑगस्ट आहे हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते हे चुकीचे असल्याचे म्हटले. त्यांनी सेक्रेटरीला विचारावे हे चूक असल्याचे मी म्हटले होते. आधीच त्यांनी वाचून यायला हवे होते, असे मत मी मांडले. तसेच मी तिथे असतो, तर कानाखाली मारली असती, असे म्हणालो होतो, असे राणे यांनी स्पष्ट केले.