राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा मुहूर्त अखेर ठरला!


मुंबई, 23 ऑगस्ट : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे आता स्थानिक निवडणुका घेण्याबाबत अखेर तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. पण, या निवडणुका आता मार्च महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होतील. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिनी विधानसभा सारखी ही निवडणूक असणार आहे.

तब्बल अंदाजे 7 कोटी मतदार या निवडणुकीत आपले स्थानिक प्रतिनिधी निवडणार आहे. डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या आणि मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. एकूण 15 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. एकूण अडीच कोटी मतदार या निवडणुकीत आपला बजावतील.

मुदत संपलेल्या महापालिकांमध्ये नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद महापालिकांचा समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या महापालिका 10 बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती अकोला आणि नागपूर महापालिका आहे. तसेच, 310 नगरपालिका आणि नगर पंचायत यात 1 कोटी 26 लाख मतदार असतील.

यात 100 नगरपालिकांची मुदत संपली आहे, तर फेब्रुवारीमध्ये 210 नगरपालिकांची मुदत संपणार आहे. सुमारे 3 कोटी 50 लाख मतदार असलेल्या 27 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहे. 27 जिल्हा परिषद आणि 5 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणूक त्याच बरोबर 299 पंचायत समितीच्या निवडणूक होतील. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेची मुदत संपली आहे.

त्याचबरोबर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम नागपूर या जिल्हा परिषदमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पोटनिवडणूक होणार आहे. तर ठाणे, पालघर वगळून सर्व जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. राज्यातील 200 ग्रामपंचायतच्या निवडणूक याच कालावधीत होतील. त्यामुळे निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आता कामाला लागण्यास हरकत नाही.