मोदी सरकारने अफगाणिस्तान परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बोलावली सर्वपक्षीय बैठक


नवी दिल्ली – अफगाणिस्तामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होईल. तालिबानने सत्ता काबीज केलेल्या अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींबाबत परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना या बैठकीत माहिती द्यावी, असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना माहिती का देत नाहीत, असा सवाल केला होता. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या हिंदू आणि शीख तसेच अफगाणी नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन भारताने दिले आहे.

तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतर इतर देश तिथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणत आहेत. त्याचबरोबर काही अफगाणी नागरिकांना देखील आश्रय देण्यासाठी देशात आणले जात आहे. भारतीय वायू दलाने नुकतेच अफगाणिस्तानमधील संघर्षजन्य आणि भीतीदायक परिस्थितीत रविवारी १०७ भारतीयांसह एकूण १६८ जणांना काबूलमधून बाहेर काढून भारतात आणले.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या अंदाजानुसार, ४०० भारतीय अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच भारत सरकारने अफगाणिस्तानातून परतलेल्यांना मोफत कोरोना, पोलिओ लस – ओपीव्ही आणि एफआयपीव्ही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या लोकांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.