नारायण राणेंना सूक्ष्म, लघु खाते मिळालेले असल्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे – गुलाबराव पाटील


मुंबई – आपण सर्वांनी नारायण राणे किती दिवस अस्वस्थ होते हे पाहिलेले आहे. आता मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा बाहेर निघालेला आहे. ते पूर्वी शिवसेनेत अस्वस्थ होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले, तिथे अस्वस्थ झाले. आता सूक्ष्म, लघु खाते त्यांना मिळालेल्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले असल्याचे म्हणत शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलाताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे कंटाळले असून मातोश्रीवर विचारुनच त्यांना सर्व निर्णय घ्यावे लागतात, असा आरोप केला होता. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री उरले असल्याचेही जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने वसईत आलेल्या नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी या पार्श्वभूमीवर नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान गुलाबराव पाटील यांनी यावेळी आनंद दिघे यांचे एकनाथ शिंदे हे चेले आहेत. ठाण्यात शिवसेनेचा झेंडा ज्या आनंद दिघेंनी कायम फडकवत ठेवला, त्यांचे हे चेले असल्यामुळे हवामानाचा अंदाज ज्याप्रमाणे चुकीचा लागतो, ज्यावेळी सांगावे पाणी पडणार नाही, तेव्हा पाणी पडते आणि ज्यावेळी सांगावे पाणी पडणार तेव्हा पाणी पडत नाही. तसा हा नारायण राणेंचा पोकळ अंदाज असल्याचे देखील बोलून दाखवले आहे.

तर दूसरीकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील असे सांगून माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार, हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.