मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे प्रयोग विरोधकांनाही करावे लागतील : सामना


मुंबई : एकेकाळी सत्तेत भाजपसोबत वाटेकरी असलेली शिवसेना सध्या भाजपवर रोज टीकेचे बाण सोडत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेने भाजप नेतृत्वावर आज देखील मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. सामनामध्ये म्हटले आहे की, 2024 चे लक्ष्य वगैरे ठीक आहे, पण विरोधकांनाही मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग करावेच लागतील. मोदी नामाची जादू ओसली असल्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील, असा सल्ला शिवसेनेने विरोधकांना दिला आहे.

अग्रलेखात पुढे असे म्हटले आहे की, मोदी सरकारच्या मंत्र्यांची सध्या एक जन आशीर्वाद ‘जत्रा’ सुरू केली आहे. फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम त्या जत्रेत सुरू आहे. विचार व आचाराने या जन आशीर्वाद जत्रेतील अर्धे मंत्री हे उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपमध्ये घुसले आणि मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. भाजपचा प्रचार हे उपरे करत फिरत आहेत व त्या ‘जत्रे’त वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत, महाराष्ट्रासह देशभरात अशी एक गंमत सुरू असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील, असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.

2024 च्या निवडणुकांना विरोधी पक्षांची एक मोट बांधून सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. देशातील विरोधी पक्षांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने एक बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेससह 19 राजकीय पक्ष सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नको तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने सामनात म्हटले आहे.

मोदींचे सरकार 19 राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच डळमळीत झाले व गेले या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाड्यांची डागडुजी करून त्यांना बरे स्वरूप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये, असे देखील सामनात म्हटले आहे.