आपल्याच पक्षाच्या मंत्र्या विरोधात कारवाई करण्यासाठी काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र


नागपूर : आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई करा अशा आशयाचे एक पत्र मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पक्षाच्या माजी आमदारने लिहिले आहे. आपल्या पक्षाचे मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस नेते आणि माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नागपूर जिल्हा बँकेचे 2002 मध्ये मंत्री सुनील केदार अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवून बँकेचे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे आरोप आहेत. केदार व इतर 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला आहे. मागील 19 वर्षांपासून हा खटला न्यायालयात सुरु आहे. आता याप्रकरणी सरकारी वकील म्हणून आसिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या लीगल सेलचे आसिफ कुरेशी हे अध्यक्ष असल्यामुळे या खटल्यात ते योग्य बाजू मांडू शकत नसल्याचा आरोप करीत आसिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळातूनही सुनील केदार यांनाही बरखास्त करावे अशी मागणी करणारे पत्र आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

अशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, नागपूर जिल्हा बँकेचे सुनील केदार अध्यक्ष असताना हा घोटाळा झाला होता. तेव्हा जनसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. आज 19-20 वर्ष झाल्यानंतर ही न्यायालयीन प्रक्रिया अंतिम टप्यावर आली आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने नवीन वकील ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती केली.

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे ॲड. आसिफ कुरेशी हे अध्यक्ष आहेत. सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत. म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?, अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी ॲड. उज्ज्वल निकम सारख्या एखाद्या सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणी अशिष देशमुख यांनी केली आहे.