निती आयोगाने वर्तवला पुढच्या महिन्यात एका दिवसात ४ ते ५ लाख कोरोना रुग्ण येण्याचा अंदाज


नवी दिल्ली – देशावर ओढावलेली कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे देशभरातील अनेक राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. पण असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना लसीकरण मोहीमेचा वेग वाढवण्यात आला, असून आतापर्यंत सहा कोरोना प्रतिबंधक लसींना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांनी गेल्या महिन्यात काही सूचना दिल्या आहेत. त्यात १०० पैकी २३ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

यापूर्वीही सप्टेंबर २०२० मध्ये निती आयोगाने दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. पण आता वर्तवलेला अंदाज अधिक जास्त असल्याचे दिसत आहे. गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या जवळपास २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल, असेही सांगितले असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिले आहे. दुसऱ्या लाटेवेळी आधारित पॅटर्नवर हॉस्पिटल बेड बाजूला ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आपल्याला कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. एका दिवसात ४ ते ५ लाख कोरोना रुग्ण येण्याचा अंदाज आहे. पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहीजेत. यात व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड (त्यापैकी ५ लाख ऑक्सिजन बेड) आणि १० लाख कोविड आयसोलेशन बेड असावेत, अशा सूचना निती आयोगाने दिल्या आहेत. दुसऱ्या लाटेवळी म्हणजेच १ जूनला देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १८ लाख होती. तेव्हा २१.७४ टक्के रुग्णांना १० राज्यातील रुग्णालयात भरती करावे लागले होते. यापैकी २.२ टक्के रुग्णांना आयसीयूत भरती करण्यात आले होते.

काही महिन्यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तेव्हा १०० पैकी २० कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यापैकी तीन जणांना आयसीयूत भरती करावे लागेल. तसेच लक्षणे नसलेल्या ५० जणांना सात दिवसांसाठी विलगीकरण केंद्रात ठेवावे लागेल. तसेच उर्वरित कोरोना रुग्णांना घरी ठेवावे लागेल, अशा सूचना दिल्या होत्या.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोविड रुग्णालये आणि बेडच्या वापरावर आधारित हा सर्व अंदाज होता. पहिल्या लाटेदरम्यान १०० पैकी २० जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २.४३ लोकांना आयसीयूची आवश्यकता भासली होती. ८० जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते आणि त्यापैकी ५५ जणांना कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्यात आले होते. आता दुसऱ्या लाटेनंतर अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे.