काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर चेंगराचेंगरी; ७ नागरिकांचा मृत्यू


काबूल – अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नरकयातना तालिबानच्या राजवटीत भोगव्या लागतील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अशातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी पाहायला मिळत असल्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच लोकांची गर्दी काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर झाल्यामुळे तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ब्रिटिश लष्कराने दिली आहे.

सध्याच्या घडीला अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थितीला सुरक्षितरित्या हाताळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे, ते केले जात असल्याचे ब्रिटिश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितले आहे. तालिबानच्या राजवटीनंतर पळून जाण्यासाठी विमानतळ केंद्रबिंदू ठरत असल्यामुळे विमानतळावरील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

वायू सेनेचे एक विशेष विमान आज (रविवार)पहाटे अफगाणिस्तानवरून ८७ भारतीयांना घेऊन दिल्लीत दाखल झाले. या नागरिकांना काल(शनिवारी) भारतीय वायू सेनेच्या विमानाद्वारे सर्वप्रथम काबूलवरून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेण्यात आले होते. या पाठोपाठच भारतीय वायू सेनेच्या C-17 या विमानाने देखील काबूलहून १६८ नागरिकांना घेऊन परतले आहे.

दुसरीकडे, सध्या अमेरिकन सैन्य काबूल विमानतळावर दाखल असून त्यांच्याकडून भारताला रोज दोन विमान फेऱ्यांना परवानगी दिली आहे. अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना अमेरिकादेखील काबूलवर विमानतळावरून परत आणत आहे. सध्या काबूल विमानतळावर जवळपास पाच हजाराच्या संख्येने अमेरिकन व नाटो सैन्य दाखल आहे.