…अन्यथा जम्मू काश्मीरवासियांच्या असंतोषाचा उद्रेक होईल; मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा


श्रीनगर : पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला शेजारी देशात बघा, अमेरिकेला कसे पळून जावे लागले आहे. जम्मू काश्मीरवर केंद्र सरकारने चर्चा नाही केली, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. त्यांनी हा इशारा कुलगाम या ठिकाणी एका जनसभेत बोलताना दिला आहे.

मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, आमची परीक्षा घेऊ नका, वेळीच सुधारणा करा. ताकतवान अमेरिकेला सुद्धा अफगाणिस्तान सोडून जावे लागले. ज्या प्रकारे जम्मू काश्मीरवर माजी पंतप्रधान वाजपेयींनी चर्चा सुरु केली होती, त्याच प्रकारे केंद्र सरकारने आता चर्चा केली पाहिजे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, जम्मू काश्मीरच्या लोकांवर गेल्या दोन वर्षांपासून ज्या प्रकारे अन्याय करण्यात आला आहे, त्यांच्या अधिकारांचे ज्या प्रकारे दमन करण्यात आले आहे, ते पाहता लोकांच्या असंतोषाचा उद्रेक कधीही होऊ शकतो. त्यावेळी भारतीय लष्कराचे तेच हाल होतील, जे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या सैन्याचे झाले. बलाढ्य हत्तीला एक छोटीशी मुंगीही सळो की पळो करु शकते. काश्मीरी लोक भ्याड नाहीत, पण शस्त्रही उचलणार नाहीत. ज्यावेळी लोकांचा संयम सुटेल त्यावेळी तुम्ही राहणार नाही.

ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले. त्या वेळीपासून त्या ठिकाणी निवडणुका झाल्या नसून केंद्र सरकारच्या हातामध्ये सर्व अधिकार एकवटले आहेत. जम्मू काश्मीरचे केंद्र सरकारने विभाजन करुन जम्मू, काश्मीर आणि लडाख असे तीन केंद्र शासित प्रदेश निर्माण केले आहेत. वेगळ्या राज्याचा दर्जा काढून घेतल्यामुळे त्या ठिकाणच्या राजकारण्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.