मातोश्रीवर विचारुनच घ्यावे लागतात एकनाथ शिंदेंना सर्व निर्णय ; नारायण राणेंचा गौप्यस्फोट


मुंबई – शिवसेनेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे कंटाळले असून मातोश्रीवर विचारुनच त्यांना सर्व निर्णय घ्यावे लागतात, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. केवळ सहीपुरते एकनाथ शिंदे हे मंत्री उरले असल्याचेही ते म्हणाले आहेत. जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने वसईत आलेल्या नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतानाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची ‘चिरंजीव मंत्री’ म्हणून खिल्ली उडवली.

शनिवारी वसई विरार शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आली. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असले तरी ते सहीपुरते आहेत. मातोश्रीच्या परवानगीशिवाय एकही फाईल हालत नसल्याचे नारायण राणे म्हणाले. यावर तुमच्याकडे येणार आहेत का? असे विचारण्यात आले असता, आले तर घेऊन टाकू, असे उत्तर दिले. एकनाथ शिंदे या प्रकाराला कंटाळले असून लवकरच निर्णय होईल, असा गौप्यस्फोट यावेळी नारायण राणे यांनी केला.

नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मध्येच वसईचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला गेल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. राणे यांनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी विरोध केला; परंतु त्याला न जुमानता राणे ठाकूर यांना भेटायला गेले. ठाकूर यांनी राणे यांचे स्वागत करत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. जन आशीर्वाद यात्रा रात्री ८ च्या सुमारास राणे यांची विरार येथे पोहोचली. त्या वेळी आमदार आणि हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर राणे यांच्या स्वागताला गेले. त्यांनी राणे यांच्या पाया पडून अभिवादन केले आणि भेटीला बोलावले.

नारायण राणे यांनी ठाकूर यांना भेटायला जाऊ नये, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. त्याला न जुमानता राणे ठाकूर यांना भेटायला विवा महाविद्यालयात गेल्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. ठाकूर यांनी राणे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. एवढे दिवस मेहनत करून यात्रेचे आयोजन केले आणि एका क्षणात बट्ट्याबोळ केल्याची प्रतिक्रिया एका भाजप नेत्याने दिली. ज्यांच्याविरोधात लढायचे आहे, त्यांचीच गळाभेट घेणे हे कार्यकर्त्यांना नाउमेद करणारे लक्षण असल्याचे या नेत्याने सांगितले.

दरम्यान मुंबईत भारतीय जनता पक्षाने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेविरोधात ३६ गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वी १९ गुन्हे नोंदविण्यात आले होते. शनिवारी यामध्ये आणखी १७ गुन्ह्यांची भर पडली. विनापरवानगी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन करून या यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईतही विविध ठिकाणी गेलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी, आग्रीपाडा, सहार विमानतळ, काळाचौकी, शीव, आझाद मैदान, गावदेवी, मुलुंड, पवई, एमआयडीसी, मेघवाडी, गोरेगाव, चारकोप, बोरीवली आदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३६ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्तीव्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.