
लखनऊ : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आपले सहकारी कल्याण सिंह यांच्या निधनामुळे आपण राम जन्मभूमी आंदोलनाचा चेहरा हरपला असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या राम जन्मभूमीच्या आंदोलनावेळच्या अनेक आठवणी आजही आपल्या मनात ताज्या असल्याचेही यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या निधनावर अडवाणींनी व्यक्त केल्या भावना
शनिवारी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन झाले. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कल्याण सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
उत्तर भारतातील एक आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा असलेले नेते म्हणून कल्याण सिंह हे ओळखले जायचे. त्यांनी राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. उत्तर प्रदेशातील अलिगड येथे कल्याण सिंह यांच्या जन्म 6 जानेवारी 1932 साली झाला. देशात मंडल कमिशनचे वारे वाहत असताना भाजपने ‘कमंडल’चा नारा दिला. त्यावेळी उच्चवर्णीय समाजाबरोबरच इतर जातीतील युवकांना भाजपकडे आकर्षित करण्यामध्ये कट्टर हिदुत्वाचा चेहरा असलेल्या कल्याण सिंह यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्याचाच परिणाम म्हणून उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत आले आणि मुख्यमंत्री पदाची माळ कल्याण सिंह यांच्या गळ्यात पडली.
