काल दिवसभरात 36 हजार 571 कोरोनाबाधितांची नोंद, तर 540 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना महामारीचा देशातील प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोनाचे संकट अद्याप कायमच आहे. दरम्यान काल दिवसभरात 36 हजार 571 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 540 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 3 लाख 63 हजार 605 वर पोहोचली आहे.

कालपर्यंत देशात देण्यात आलेल्या लसींच्या डोसची संख्या 57.16 कोटींच्या पार पोहोचली आहे. तर, 48 लाखांहून अधिक डोस काल देण्यात आले आहेत. लसीकरण अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर 37 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपैकी 18-44 वयोगटातील एकूण 21,13,11,218 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर एकूण 1,79,43,325 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 57,16,71,264 नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 5 हजार 225 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 557 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 14 हजार 921 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 96.93 टक्के झाला आहे. तसेच राज्यात काल (गुरुवारी) 154 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे.

काल एकाही मृत्यूची नोंद एकूण 33 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात झालेली नाही. धुळे, नंदुरबार, परभणी, अकोला, वर्धा, गोंदिया या पाच जिह्यांमध्ये काल एक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,17,14,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,11,570 (12.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,29,047 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या राज्यात 57 हजार 579 रुग्णावर उपचार सुरु आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या शुन्यावर आली आहे. तर सर्वाधित 12 हजार 917 अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. तर जळगाव 35, नंदूरबार- 0, धुळे- 6, परभणी – 16, हिंगोली – 76, नांदेड- 46, अमरावती 88, अकोला- 24, वाशिम – 7, बुलडाणा – 29, यवतमाळ- 16, वर्धा- 5, भंडारा- 3, गोंदिया- 2, गडचिरोली- 32 या जिल्ह्यामध्ये अक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत.

काल दिवसभरात मुंबईत 283 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 203 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 7,19,158 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर काल दिवसभरात मुंबईत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 2,760 सक्रिय रुग्ण आहेत.