शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाच्या शुद्धिकरणावर नारायण राणेंची प्रतिक्रिया


मुंबई – केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी गुरुवारी सायंकाळी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. त्यानंतर नारायण राणे यांनी याविषयी आपल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांना खडे बोलही सुनावले.

राणे पत्रकारपरिषदेत बोलताना म्हणाले, पत्रकारितेचा मी आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळे स्थान आहे. मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही. आम्हालाही पत्रकारांचे मार्गदर्शन मिळावे, तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. पण सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारणा करत आहेत. ह्या एकाच विषयासाठी आम्ही आलो आहोत का?

राणे पुढे म्हणाले, कोणासमोर मला नतमस्तक व्हावेसे वाटतं, नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे. आता त्यात गोमूत्र कोणाला शिंपडायचे शिंपडू द्या, कोणाला प्यायचे त्याला पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध? मला काय विचारता, त्यांना विचारा ना की का शिंपडले? काय दूषित झाले होते?

त्यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या दुरावस्थेबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, जर एवढाच स्मारकाबद्दल आदर आहे, तर ते ज्या स्थितीत आहे, त्याकडे लक्ष द्या. पँट वर करून चिखलातून तिकडे जावे लागते. अनेक स्मारके मी पाहिली आहेत, त्याच्या आजूबाजूला सुंदर लॉन असते, सुशोभीकरण केलेले असते. झाडे असतात. येथे काय आहे? साहेबांचा फोटोही नीट दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले ना, त्यांनी ते स्मारक जागतिक किर्तीचे कसे होईल याकडेही पाहावे, हेच माझं त्यांना उत्तर आहे. स्मारकाचे शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी स्वतःची मन शुद्ध करा.