राज ठाकरेंच्या ‘जातीवादा’च्या आरोपांना अजित पवारांचे उत्तर


पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यातील जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप केला होता. आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या या आरोपांना पुण्यात माध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.

राज्यात जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर वाढल्याच्या आरोपावर उत्तर देताना शरद पवारांनी जोरदार टोला लगावला होता. त्याचबरोबर शरद पवारांनी राज ठाकरेंना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असा सल्ला देखील दिला होता. त्यानंतर आज अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी याच मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता त्यांनीही राज ठाकरेंवर त्यांच्या स्टाईलमध्ये निशाणा साधला.

कायमच पुरोगामी विचार शरद पवारांनी मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोक असे बोलून जातात, पण त्याला महत्व देण्याचे कारण नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी जातीचे राजकारण सुरू झाले आहे का?, असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप राज यांनी केला होता.

आधीपासूनच राज्यात जाती होत्या. पण अभिमान बाळगण्यापुरत्याच जाती होत्या. मात्र हे चित्र गेल्या 20 वर्षापासून बदलले. जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा लोक तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. महाराष्ट्रात जातीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सर्वार्थाने मोठा झाला, असे राज म्हणाले होते.