जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंनी साधला निशाणा


मुंबई – आज सकाळी ११ च्या सुमारास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी नारायण राणे यांनी तिथपासूनच आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील जनता महाराष्ट्रातील आत्ताच्या सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा कोणताही विकास करू शकत नसल्याचे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी नारायण राणेंनी राज्य सरकारवर टीका करतानाच जनतेसाठी भाजप आशेचा किरण असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. म्हणून जनता आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन असल्यामुळेच यात्रेला उपस्थिती दिसत असल्याचे राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी यावेळी बोलताना मंत्रिपद दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मी केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने सहभागी झालो आहे. मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले.

नारायण राणेंनी यावेळी केंद्रात मंत्री म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत बसल्याचा अनुभव सांगतला. मला दिल्लीच्या मंत्रिमंडळात दीड महिना झाला. एक वेगळा अनुभव तिथे मला घेता आला. मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात बसताना सुरुवातीला मी केंद्राच्या मंत्रिमंडळात बसलो आहे, असे वाटलेच नाही. मला वाटले कुठे देवेंद्र फडणवीस दिसतील, आशिष शेलार दिसतील. पण ते दिसलेच नाहीत. तेव्हा मला जाणवले की आपण केंद्रात आलो असल्याचे ते म्हणाले.