सर्व सामान्यांच्या जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या पेसेंजर गाड्या अद्याप बंदच


बुलडाणा : मुंबई नागपूर मार्गावरील रेल्वेने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून साधारणतः एप्रिल 2020 पासून सर्वच प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. काही प्रवासी गाड्या मध्यंतरी सुरूही केल्या होत्या. पण पुन्हा दुसरी लाट आल्यामुळे बंद केल्या आहेत. अनेक प्रवासी एक्सप्रेस गाड्या या मार्गावर सुरू आहेत. पण अजूनही सर्व सामान्यांच्या प्रवास करण्याची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या पेसेंजर गाड्या अद्याप बंदच आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत असून महागड्या एक्सप्रेस गाड्या या आरक्षित राहत असून त्याच भाडे सुद्धा जास्त असते. अनेक एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत, त्यामुळे कोरोना वाढत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असल्यामुळे नागपूर मुंबई मार्गावर पेसेंजर गाड्या सुरू करून सर्वासामान्य प्रवाशाना दिलासा द्यावा, अशी मागणी आता समोर येत आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जन संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या राज्यात अनेक रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. दरम्यान कोरोना आता नियंत्रणात असून लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत. राज्य व केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या होणारी गैरसोय बघता लवकर पॅसेंजर ट्रेन टप्प्या टप्प्याने का होईना सुरू करावी, अशी मागणी आता राज्यातील रेल्वे प्रवाशी संघटना करत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून गोरगरिबांची प्रवासाची हक्काची पॅसेंजर रेल्वे गाडी बंद असल्यामुळे लाखो गोरगरीबांची बाहेरगावी जाण्याची कुचंबणा होत आहे. लॉकडाऊनच्या कारणाने बंद केलेली पेसेंजर ट्रेन आता कोरोना नियंत्रणात आल्यामुळे ज्याप्रमाणे एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत, त्याच धर्तीवर पॅसेंजर ट्रेन सरकारने सुरू करून गरीब जनतेला न्याय द्यावा ही मागणी आता जोर धरत आहे.

किती प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो?

  • राज्यात मध्य, पश्चिम, कोंकण आणि दक्षिण मध्य विभागात रेल्वेच्या जवळपास 82 पॅसेंजर ट्रेन बंदच आहेत.
  • जवळपास 45 पॅसेंजर ट्रेन एकट्या मध्य रेल्वेच्या बंदच आहेत.
  • भुसावळ रेल्वे विभागात भुसावळ-सुरत आणि भुसावळ-नंदुरबार या दोन पॅसेंजर ट्रेन सुरू आहेत.
  • राज्यातील 45 पॅसेंजर ट्रेन बंद असल्यामुळे जवळपास 40 लाख प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
  • सध्या फक्त एक्सप्रेस ट्रेन सुरू असून त्याच भाडे जास्त असून त्या आरक्षित असल्यामुळे सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही.
  • पॅसेंजर ट्रेन बंद असल्यामुळे रोज जवळपास 40 लाख प्रवाशांना बस किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
  • पॅसेंजर ट्रेन बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांचे तर नुकसान होतच पण रेल्वेचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे.