देशात काल दिवसभरात 36 हजार कोरोनाबाधितांची नोंद, तर 70 टक्के रुग्ण एकट्या केरळात


नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाली असली तरी केरळ असे एकमेव राज्य आहे, जिथे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरातील एकूण आकडेवारीपैकी 70 टक्के कोरोनाबाधितांची नोंद फक्त केरळात झाली आहे. आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 36,401 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 530 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तसेच 24 तासांत 39,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

बुधवारी केरळात कोरोनाच्या 21,427 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. म्हणजेच, 70 टक्के रुग्ण केवळ केरळातीलच आहेत. अशातच कोरोनामुळे 179 रुग्णांचा मृत्यू झाला होता. केरळात नव्या कोरोनाबाधितांसोबतच एकूण बाधितांची संख्या वाढून 37 लाख 25 हजार झाली आहे. तर मृतांचा आकडा 19,049 वर पोहोचला आहे. एका दिवसात 18,731 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 23 लाख 22 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 33 हजार 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्टी म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 15 लाख 25 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. सध्या एकूण 3 लाख 64 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल (बुधवारी) 5,132 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 09 हजार 364 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93टक्के आहे. राज्यात काल (बुधवारी) 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे.

तब्बल 37 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 58 हजार 069 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0), धुळे (6), परभणी (15), हिंगोली (75), नांदेड (50), अमरावती (84), अकोला (27), वाशिम (3), बुलढाणा (37), यवतमाळ (13), वर्धा (5), भंडारा (5), गोंदिया (2), गडचिरोली (32) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भिवंडी निजामपूर, धुळे, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर सोलापूरमध्ये सर्वाधिक 756 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 14,89,080 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,06,345 (12.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,46,290 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,371 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.