काल दिवसभरात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत वाढ, तर लसीकरणाचा आकडाही घटला


नवी दिल्ली – भारतात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णवाढीत एका दिवसाच्या कमतरतेनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तसेच, लसीकरणाच्या आकड्यातही घट झाली आहे. देशात काल तब्बल पाच महिन्यांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. अशातच आज आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 35,178 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 55 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर काल देशात 88 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत 440 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 37,169 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 22 लाख 85 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 32 हजार 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 85 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 67 हजार रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. काल (मंगळवारी) 4,408 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 01 हजार 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.87टक्के आहे. काल (मंगळवारी) राज्यात 116 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

राज्यात सध्या 61 हजार 306 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0), धुळे (5), परभणी (41), हिंगोली (74), नांदेड (49), अमरावती (90), अकोला (30), वाशिम (5), बुलढाणा (45), यवतमाळ (9), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (2), चंद्रपूर (94) गडचिरोली (29) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भिवंडी निजामपूर, धुळे, जळगाव महानगरपालिका परभणी, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, गोंदिया , चंद्रपूर या जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक 821 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,12,91,383 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,01, 213 (12.48 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,53,807 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,233 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या 24 तासात मुंबईत 198 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 304 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,640 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1986 दिवसांवर गेला आहे.