भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी तालिबानची तुलना करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या खासदाराविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल!


लखनौ – सध्या जगभरात अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा सुरू आहेत. अफगाणिस्तान तालिबानने ताब्यात घेतल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, जागतिक स्तरावरून महिलांचे हक्क आणि त्यांचे संरक्षण याविषयी देखील चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे तालिबानच्या कृत्याचा अनेक देश निषेध करत असताना आणि भारतासाठी तालिबान ही अजूनही दहशतवादी संघटनाच असताना लोकसभेतील एका खासदाराने तालिबानच्या या कृत्याचे कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी थेट तालिबानची तुलना केली. या प्रकरणी संबंधित खासदार आणि इतर दोन जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काबूलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तान, चीन आणि रशियाने या घटनेवर अनुकूल प्रतिक्रिया दिलेली असताना जगभरात तालिबान्यांचा निषेधच केला जात आहे. पण, उत्तर प्रदेशच्या संभल लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ खासदार शफीकुर रेहमान बर्क यांनी तालिबान्यांच्या कृतीचे समर्थन करतानाच त्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. भारत जेव्हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी लढला होता. त्यांना स्वतंत्र व्हायचे आहे. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. आपण त्यात हस्तक्षेप कसा करू शकतो?, असे शफीकुर रेहमान म्हणाले होते.

अफगाणींना त्यांचा स्वत:चा देश त्यांना हवा तसा चालवायचा आहे. रशिया आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांनाही तालिबानी संघटनांनी अफगाणिस्तानमध्ये स्थिरावू दिलेले नाही आणि आता त्यांना त्यांचा देश स्वत: चालवायचा असल्याचे देखील शफीकुर रेहमान बर्क म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठी टीका केली जाऊ लागली आहे. या वक्तव्यासाठी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मुकीम आणि फैझान यांच्याविरोधात देखील तालिबानला अनुकूल भूमिका घेतल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शफीकुर रेहमान बर्क यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम १२४ अ (देशद्रोह) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे उत्तर प्रदेशमधील नेते राजश सिंघल यांनी शफीकुर रेहमान यांच्याविरोधात मंगळवारी तक्रार दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी दिली आहे.

शफीकुर रेहमान बर्क यांच्याविरोधात एकीकडे गुन्हा दाखल झाला असतानाच, दुसरीकडे त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी भारताचा नागरिक आहे, अफगाणिस्तानचा नाही. त्यामुळे तिथे काय घडत आहे, याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. मी माझ्या सरकारच्या धोरणांचे समर्थन करतो, असे स्पष्टीकरण शफीकुर रेहमान यांनी दिले आहे.

खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील शफीकुर रेहमान यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली होती. तालिबानचे ते निर्लज्जपणे समर्थन करत होते. याचा अर्थ तालिबान्यांच्या रानटी कारवायांचेच समर्थन करत होते. आपण एक संसदीय लोकशाही आहोत. कुठे चाललो आहोत आपण? मानवतेवर कलंक असणाऱ्या लोकांचं आपण समर्थन करायला लागलो असल्याचे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी शफीकुर रेहमान यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.